मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो,’ असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी सांगितले.
अमित शाह यांनी सहा जानेवारी २०१५ रोजी दानवे यांची प्रथम भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर १८ जानेवारी २०१६ रोजी पक्षांतर्गत निवडणुकीत दानवे यांची एकमताने व बिनविरोध प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यानंतर त्यांनी १६ जुलैला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दानवे यांच्या कारकिर्दीत भाजप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.
दानवे म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्याला पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या परीश्रमामुळे भाजपला पंचायत ते पार्लमेंट या सर्व पातळ्यांवर निवडणुकीत पहिला क्रमांक मिळाला. राज्यातील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरून पक्षाने झेप घेतली. त्यासोबत पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या प्रचंड विस्तार झाला. समाजाच्या सर्व घटकातील लोक भाजपशी जोडले गेले.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपच्या केंद्र सरकारचे काम, अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम यामुळे भाजपला यश मिळाले. पक्षाला यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या सर्व काळात राज्यातील जनतेने भाजपला भरभरून आशिर्वाद दिला, त्यांचाही मी आभारी आहे,’ अशा शब्दांत दानवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.